पतीला साथ, उदरनिर्वाहाची नवी पहाट
अवंती भोयर/ कल्याणी राठोड/ राम वाडीभष्मे
सुरुवातीला पती रवींद्र हा व्यवसाय करायचे. ते सिकलसेल (एस एस) आजार ग्रस्त असून त्यांना आलेल्या कमजोरीमुळे ते पडले होते, तेव्हा कमरेजवळ असलेला बॉल घसरला त्यामुळे त्यांना उभे राहता येत नाही. हा व्यवसाय उभे राहून करावा लागतो तसेच यात कंबर व हाताच्या हालचालींना महत्व असल्याने ते रवींद्रला शक्य नव्हते. म्हणून पंचशीला यांनी या व्यवसायात तीन वर्षाआधी हातभार लावणे सुरू केले व आज पूर्ण व्यवसाय त्या सांभाळत आहेत.
दिवसाला सरासरी पाचशे रुपये त्या कमवतात. आता उन्हाळा सुरू झाल्याने कमाई जास्त होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळात घरासमोर ठेला लावला होता व ज्या ठिकाणी हा व्यवसाय करायचे तिथे घराच्या पत्त्याची पाटी व फोन नंबर दिला होता. लोक घरी येऊन रस घ्यायचे. त्या वेळी त्यांची कमाई दोन हजार रुपयांच्या जवळ व्हायची.
सुरुवातीला रवींद्र हे निंबू सरबतचा ठेला चालवायचे, हळूहळू सर्व फळांच्या रसाची विक्री सुरू केली. रवींद्र हे बाजारातून फळ (माल) आणून देतात व दुकान पंचशीला सांभाळते. तर आधार म्हणून रवींद्र सोबत असतात.
तुम्ही ही मशीन का वापरता? बॅटरीचा वापर कां नाही?
मशीनचा रस हा चांगला असतो याची गुणवत्ता चांगली असते. बाकी बॅटरी किंवा विजेच्या मशीनने फळ पूर्ण बारीक होत असल्याने त्यात बिया सुद्धा असतात. त्यामुळे रस चव देत नाही. या मशीनला सुद्धा जास्त दिवस झाले नाहीत, तीन महिन्याआधीच घेतली. याआधीची मशीन सुद्धा खूप दिवस टिकली, ती तर आम्ही जुनीच घेतली होती.
इथे एवढी सारी दुकाने आहेत, मग तुमचा धंदा होत असतो काय? इतरांच्या तुलनेत आपण आपले वेगळेपण कसे जोपासता?
इथे असलेले सर्व ठेलेवाले आपली रोजी काढत असतात, सर्वांना धंदा मिळतो, फरक एवढाच कुणाला दुपारी तर कुणाला सायंकाळी. अशा प्रकारे सर्वांचा वेगवेगळ्या वेळेत धंदा होत असतो. सर्व दुकानवाले हीच गुणवत्ता देतात. ज्या रसाला फेस नाही त्यात भेसळ जास्त, पाणी बर्फ इत्यादी. या व्यतिरिक्त कोण काय देतो हे आपल्याला माहिती नाही कारण आम्ही इतर ठेल्यावर फिरत नसतो.
पंचशीला यांना तीन मुली आहेत. त्या ३ री, ५ वी, ८ व्या वर्गात असून तिघीही मनपाच्या शाळेत शिकतात. आतापर्यंत त्यांना कोणतीही योजना मिळाली नसून योजनेबदद्दल माहिती नसल्याचे व कुणीही माहिती देत नसल्याची खंत व्यक्त केली.
पंचशीला यांनी नववी पर्यन्त शिक्षण घेतलेले असून, वयाच्या साडेसतराव्या वर्षी त्या बालविवाहात अडकल्या व त्यांनी संसाराला सुरुवात केली. पतीला सिकलसेल ही बिमारी. त्यातही त्यांना "SS" हा प्रकार आहे. पती रवींद्रला आता पर्यन्त दोन ते तीनदा रक्त दिले असल्याचे त्या बोलल्या. या आजरामुळे त्यांच्या कमरेत गॅप आली असून, बॉल सुद्धा खराब झाला आहे. तरी सुद्धा ते एकदम तंदरुस्त असून पतिपत्नी उत्साहाने हा व्यवसाय करत आहेत.
Comments